Categories

Aeroplanes

Aeroplanes

Friday 21 August 2009

मी येतोय!

Thursday 20 August 2009

स्री. बैलांचा सण: बैल पोळा!

काल पोळा व्हता. हा स्री. बैलांचा सण असल्याने यास "बैल पोळा" पण म्हणत्यात. पण गाईंच्या सणाला "पोळी" म्हणत न्हाईत. पुण्यात चपातीला पोळी म्हणत्यात. पोळा सरावणातल्या आमुशेला येतो. वरिसभर मर-मर काम करणार्‍या स्री. बैलांनला प्रेम दाखविण्यासाठी हयो सण साजरा करत्यात. हायस्कुल संपस्तोवर मी पण बैल होतो त्यामुळे या सणाशी माझी वैयक्तिक जवळीक आहे. तसेच भारत हा शेतकर्यांचा देश असल्याने हा एक राष्ट्रीय सण असावा आनि या दिवशी सर्व्यांना सुट्टी आसावी अशी माझी इच्छा आहे. बैलपोळा हा माज्या माहितीतला - मुक्या प्रान्यांसाठी मानसासारख्या जनावरानं साजरा केलेला एकुलता एक सण आहे.


पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांच्या आदी उठतात. बैलांना नदीवर नायतर वड्यावर नेऊन निरमा लाऊन धुत्यात. शिंगे तासली जातात. नाकात नवी येसण आणि गळ्यात नवा कासरा लावतात. पायची खुरं कापुन पत्री मारत्यात.

आपल्याला नाय का आइ दिवाळीला लवकर उठ्वते आन् मोती साबणानं आंगुळ घालुन नवी कापडं देत्यात. तस या दिवशी बैलांचा लय थाट आसतुय. त्यांनला दिवसभर कामाला लावत न्हाइत. बैलांच्या वशिंडावर हळद व आसेलच तर तेल/ तुप लाऊन मालिश करत्यात. मोठं वशिंड असणारा बैल हा पैलवान बैल असतो. सर्व्या आंगावर रंगाचं नायतर गेरुचं ठिपके देत्यात आन् आपल्या हाताचे शिक्के पण मारत्यात. शिंगावर शेंदुर नायतर इंगुळ लावुन त्यावर रंग-बिरंगी बेगडं चिटकवत्यात. बेगाड लय नाजुक असतं. ते दोर्‍याने कापत्यात व त्याच्या पट्ट्या करुन ते शिंगावर लावत्यात. शिंगाच्या टोकाला चिलिमीसारखे पितळेचे एक इभुषण घालत्यात. ते पडु नये म्हणुन एक - एक मोळा बी मारत्यात. पण त्याच्यानं शिंगातुन रगत येत नाही. त्याच्यावर उभे गोंडे लावतात. गळ्यात चंगाळ बांधतात. चंगाळ घराच्या आडाला बांधल्यामुळे ते धुराने काळं कळ-कुळीत झालेलं असतं. बैलाच्या गळयात बांधाच्या आदी ते निरम्याने धुवावे लागतं. नाही तर पांढर्‍या बैलावर त्याचा काळा रंग लागतो. बैल चालताना त्या चंगळाचा लय मस्त आवाज व्हतो. गळ्यात चंगाळ्याबरोबर कवड्याच्या माळाबी बांधत्यात. पायात काळ्या आन् लाल रंगाचं करदोड्याचं तोडं बांधत्यात. त्यामुळं बैल लय भारी दिसतो आन् तेला द्रुष्ट लागत नाय.. म्हणुन मी अजुनपर्यंत माझ्या पायात काळा करदोडा बांधतो.

पाठीवर नक्शी केलेलं झुल टाकत्यात. आन् त्यां सगळ्याशिनला गावातन वाजवत नेत्यात. त्यांच्या मोरं हालगी वाजणार मस्त ठेका लाउन वाजवत असतो. डांग नाकी कोकणाकी..डांग नाकी कोकणाकी.. ड डांग डांग नाकी कोकणाकी.. असा आवाज आसतोय.

गावातल्या येशीवर सगळी बैलवाली मंडळी गोळा होत्यात .. मग वाजंत्री .. नगारं .. ढोल.. सनया वाजवुन झडत्या म्हणत्यात. जिकणार्‍या पार्टीस सरपंच नायतर पाटील इनाम देत्यात. त्यातपन येकादा आगावपणा करुन भाशनाला उभारतो. बैलाची तारीप करत्यात. आन् पावसा-पान्याच्या गोश्टी पन. पान तंबाकुचं देनं-घेनं होतं आन् मग पोळा फुटतो. मग संद्याकाळी परतीच्या वाटंवर मारतीच्या देवळाला दर्शनाला जात्यात. घरी आल्यावर पुन्यांदा बैलांनला आन् बैलकर्‍यास ववाळतात. बैलाशिनला खायला पुरणाची पोळी आन् सुग्रास - पेंडीचा निवद देत्यात. बैलकर्‍यासबी नवी कापडं मिळत्यात. दिवसबर दोगंबी लय खुशीत असत्यात.

असा हा स्री. बैल पोळा मला लय - लय आवडतो. तुमास्नी बी आवडतच आसल. व्हय ना... मान हालउ नगा... तसं लिव्हा!
मामाच्या गावी पोळा मोठ्या आनंदानं साजरा केला जायचा. " सादया - महादया " ही बैलांची जोडी मनात कायम राहिलेली. अगदी मोटनं पाणी खेचण्यापासुन नांगरणी - पेरणीच्या वेळी नांगरावर बसुन मामाबरोबर - बैलांबरोबर फिरायचो. आज त्या आठवणी पुन्हा दस्तक देऊन गेल्या!

Saturday 15 August 2009

गेलं वर्ष ....

गेलं वर्ष काही चांगल्या आठवणींपेक्षा वाईट अनुभवातच जास्त गेलं. या वर्षातल्या माझ्या काही आठवणी...

ऑगस्ट २००८:
सप्टेंबर २००८:
ऑक्टोंबर २००८:
  • केंबोर्नच्या गेस्ट हाऊसमध्ये दिवे लाऊन साजरी केलेली "शांत" दिवाळी - अविस्मरणीय!
नोव्हेंबर २००८:
  • कॅब्रिजचे फायरवर्कः या वर्षीच्या हुकलेल्या दिवाळीची मजा आम्हीं इथे भरुन काढली...!
  • लंडन सोबत - विंम्बली स्टेडियमला पण जाऊन आलो. या शिवाय नेस्डेनच्या स्वामी नारायण मंदिरातही ... जगप्रसिध्द आणि गिनिज बुक मध्ये रेकौर्डस असलेले हे मंदिर इकडे सायबाच्या देशात ....वा!
  • मुंबईवरच्या त्या दहशतवादी हल्ल्याचं लाईव्ह प्रक्षेपण केंबोर्न मधुन पाहणं... टि.व्ही. वरच्या त्या मुर्खांना आतघुसुन मार मार मारावं असं वाटणारं... आतुन आक्रोश करणारं मन... भरलेले डोळे... सारं कसं सुन्न करणारं. ती काळी रात्र तशीच जागुन काढलेली... ! त्या वीर शहीदांना त्रिवार वंदन अन् भावपूर्ण श्रद्धांजली...!
डिसेंबर २००८:
  • यु. के वरुन परत. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतरचं एअरपोर्टवरचं वातावरण, अफवा यांनी लोकांना जीव मुठीत घेऊन - चुपचाप बाहेर पडताना पाहणं त्या दहशतवादी हल्ल्याची जाणीव वारंवार करुन देत होतं

जानेवारी २००९:
  • छोकरीच्या शाळेच्या दाखल्यासाठी बिशप स्कुलमध्ये हजर राहणे आणि इंटरव्ह्युव देणे... नोकरीच्या वेळीही आलं नव्हतं तेवढं टेंशन होतं!
  • मनात नसतानाही पुन्हा यु.के. ला जावं लागलं. छोकरीच्या शाळेचं/ दाखल्याच टेंशन आणि राहुन राहुन उठणार्‍या आतंकवादी हल्ल्याच्या अफवांचं वेगळंच टेंशन!
फेब्रुवारी २००९:
मार्च २००९:
  • यु.एस. मध्ये लिलावात काढलेल्या गांधींच्या काही वस्त बोली जिंकुन परत मिळवल्याबद्दल विजय मल्ल्यांचे फार कौतुक वाटले... मंड़ळ आपले आभारी आहे!
एप्रिल २००९:
मे २००९:
  • यु.के. वरुन परत आल्यानंतर - मुंबई एअरपोर्टवर स्वाईन फ्ल्यु ची टेस्ट न होता केवळ नाव - पत्ता लिहुन जायलासांगणे - अगदीच सरप्राइजिंग होतं!
  • फॅमिलीसहितची लाँग पेंडिंग कोंकण यात्रा चांगली झाली
जुन २००९:
जुलै २००९:
ऑगस्ट २००९:
  • स्वाईन फ्ल्यु चा भारतातला पहिलाच बळी पुण्याचा... कुणाची चुक, काय कारणं.... अनेक अनुत्तरीत प्रश्न!

अरे हां, तुम्ही म्हणाल - हे कोणतं वर्ष मधेच उद्भावलं ?
तर - काल माझा वाढदिवस होता.. आणि वरच्या आठवणी ऑगस्ट २००८ ते ऑगस्ट २००९ या वर्षाच्या आहेत!

Friday 14 August 2009

स्वातंत्र्य दिनाच्या लाख - लाख शुभेच्छा!


एक जात, एक धर्म - मी भारतीय!
स्वातंत्र्यदिन चिरायु होवो!
स्वातंत्र्य दिनाच्या लाख - लाख शुभेच्छा!

Wednesday 12 August 2009

पूणेरी वाहन - चालक कसा ओळखावा?

गेल्या दहा वर्षात पुण्यातला वाहतुकीचा आणि वाहनचालकांचा अनुभव पाहता, मी खालील तर्क काढले आहेत.
कदाचित ते चुकीचेही असतील किंवा त्यामध्ये तुम्हाला अतिशोक्तीही वाटेल... पण मी माझ्या मतावर अजुनही ठाम आहे!

१. वाहतुकीचे नियम पाळले तर आपली गर्लफ्रेंड / मित्र आपल्याला भ्याड समजेल / समजतील अशी यांची पक्की समजुत असते.
२. समोर पोलीस दिसला तरच नियम पाळायचा, असा पुणेकरांचा स्वतःचा नियम असतो.
३. समोरच्या चौकात पोलीस आहेत की नाही, याची दुरूनच खात्री करुन घ्यायची आणि जर तो नसेल, तर एकदम बिनधास्त - स्पीडमध्ये सिग्नल तोडून वन-टु का फोर व्हायचे हे त्यांना कुणी सांगावे लागत नाही!
४. सिग्नल ऑरेंज होत असेल तर, स्पीड कमी न करता, अधिकच वाढवत, गाडी तशीच दुमटत पुढे न्यायची... भलेही रस्त्याच्या मधोमध थांबावे लागले तरी हरकत नाही!
५. सिग्नल ग्रीन झाला की तुमच्या पाठीमागचा न चुकता हॉर्न वाजवतोच! बर्‍याचदा असा हॉर्नच सिग्नल ग्रीन झाल्याची निशाणी असते!
६. आपल्या लाखाच्या गाडीला दोन इंडिकेटर्स असतात यांची जाणीव आणि त्यांचा वापर, या दोन्ही गोष्टींचा यांना पुर्ण विसर पडलेला असतो. इंडिकेटर लावलाच तर तो गाडी बंद होई पर्यंत चालुच असतो!
७. कानात हेडफोन घालुन एखासा चार चाकी गाडी चालवत असेल तर - साहेबांनी आत्ताच दुचाकी विकुन - चारचाकी घेतली आहे असे समजावे!
८. अशा इस्टंट गाडीवाल्यांपासुन दहा -फुट अंतराने आपले वाहन हाकावे. यांची दुचाकीची सवय अजुनही गेलेली नसते - ते कधी - कसाही कट मारु शकतात!
९. झेब्रा क्रॉसिंग - फुटपाथ या ठीकाणांची यांना खास आवड - आकर्षण असते. त्यावर गाडी थांबवणे - चालवणे - याला ते शौर्य समजतात!
१०. गाडी चालवताना, ओव्हरटेक कोणत्या बाजुने करावे - यापेक्षा थोडीशी मोकळी जागा कोणत्या बाजुला आहे, यावर त्यांचे खास ध्यान असते आणि चुकुन अशी थोडीशी जागा मिळाल्यास ते कुशलतेने ओव्हरटेक करतात!
११. नो - एन्ट्री/ रोड क्लोज्ड असे बोर्ड असताना देखिल हे त्या रोडवर एन्ड पर्यंत जातील. परत येतील... मात्र दुसर्‍या दिवशी पुन्हा तो रोड चेक करायला जरुर जातील.
१२. हेल्मेट घालणं म्हणजे यांना जीवावर आल्यासारखे वाटते. त्याच्या विरोधात ते राष्टीयच काय आंतराष्ट्रीय पातळीवरही लढायला तयार असतात.

मला वाटतं:
१३. रिक्षा चालकांना पुण्यात खास ट्रेनिंग दिले जाते. कुठेही ३६० डिग्रीमध्ये वळावे... सायकलही न जाणार्‍या जागेतुन रिक्षा कशी घालावी... कुणी हात केलाच तर जागेवरच कसे थांबावे - हे त्यातले काही धडे!
१४. पी.एम.टी. वाल्यांना वर ट्रेनिंग घेतलेल्या रिक्षावाल्यांकडुन खास सवलतीच्या दरात तेच ट्रेनिंग दिले जाते.
१५. चार चाकी वाला नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाल्याकडे अगदीच तुच्छतेने पाहतो. उगाचच, अशी एखादी तरी झलक देतीलच!


बाकी, आपण अनुभवी आहातच... आपले अनुभव - तर्क काय म्हणताहेत?

Tuesday 11 August 2009

आपण यांना पाहिलंत का?

आ. मा. पुण्याचे पालन कर्ता/धर्ता - श्री. सुरेश/जी कलमाडी/जी/साहेबजी
आणि त्याच तोडीचे
श्री. अजितदादा/जी/राव पवार/जी/साहेब.

माननीय महोदय,
आपणांस आठवण्यास कारण की वि. वि.

बरेच दिवस झालं, आपणांस लिहिन - लिहिन म्हणत होतो... पण कामांतुन वेळच मिळत नव्हता आणि आता स्वाईन फ्लुच्या टेंशन मुळं कामात लक्ष लागत नाही.... ! म्हटलं लिहावं ...
तर, बरेच दिवस झाले आपलं दर्शन - साक्षात्कार नाही म्हणत हो... न्युजपेपर वगैरे मधुन, झालं नाही. आणि त्यातच स्वाईन फ्ल्युचं तांडव सुरु आहे.... वाटलं विचारपुस करावी.
जिवंत आहात न्हवं?

तसा मी काय पुणेरी नाही... पण गेली दहा वर्षे झाली इथं राहतोय.... दुसर्‍या शहरांत राहण्याच्या - सेटल होण्याच्या आलेल्या संध्या पुण्यासाठीच सोडल्या.... पुणेच आपलं मानलं...त्या पुण्याची हालत आज बघवत नाही हो.. मित्रांच्या घोळक्यात बर्‍याचदा तुमची नावं ऐकलीत... की तुम्ही लोकंच पुण्याचं माय - बाप आहात म्हणे... गार्डियन्स म्हणे.... आज न राहुन मनात प्रश्न आलाच - आपण कुठं आहात?

आम्हाला मान्य आहे की यावेळच्या इलेक्शन मध्ये आपणास भरघोस मताधिक्य मिळालं नाही.... वेबसाइट आणि सो. नेटवर्क ही गेल्या इलेक्शन पासुन अपडेट केलेल्या नाहीत.... का हो - ते काम फक्त हे इलेक्शन ते इलेक्शन असंच होतं का?

मात्र आपल्या वेबसाइट्स - फेसबुक चे प्रोफाइल बघुन हे मात्र कळाले की आपण अगदी २१ व्या शतकातील राजकारणी आहात... त्यामुळे कदाचित आपण लपुन - छपुन नव्या शतकाची वाट बघताहात काय?

फार मोठ्या अपेक्षा नाहित इथं - फक्त एक गार्डियन म्हणुन आपण आपल्या कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शक सल्ला द्या.... दवाखाने - शाळा अशा ठीकांनी कार्यकर्त्यांना पाठवुन जारगुकता करता येते का पहा... किमान तुम्ही आहात - हे तर पुण्याला दाखवुन द्या.
उद्याचं काय सांगावं - व्हिजन २०२० चा आराखडा फार सुंदर आहे... पण त्यासाठी लोकं जगायला हवीत... जगलेल्या लोकांनी तुम्हाला जाणायला हवं... जाणकारांनी मत द्यायला हवं ... आणि तुम्ही जिंकायला हवं!
तुम्हाला तरी काय म्हणायचं! खरं - खोटं देव जाणो!

कळावे,
लोभ असावा/ काळजी घ्या!
मी.

Saturday 8 August 2009

सुशिक्षित मुर्ख!

आज संध्यकाळी काही औषधे आणण्यासाठी मेडिकल स्टोअर मध्ये गेलो होतो... स्वाईन फ्ल्युच्या भीतीमुळे म्हणा वा आजारी वातावरणामुळे असो, स्टोअर हाऊसफुल्ल होतं..एक बुरखा - म्हणजे चेहर्‍यावर मुंडासे गुंडाळलेली - घातलेली बाई त्या गर्दीत घुसुन सर्वात पुढे होऊन मास्क घेण्याच्या तयारीत होती... साहजिकच सर्वांचे लक्ष तिच्याकडे लागुन होते.

SYDNEY, AUSTRALIA - APRIL 29:  A traveller wea...Image by Getty Images via Daylife

ती: ये मास्क दिखाना...
तो: ये लिजिये..
ती: क्या कीमत है?
तो: १० रु.
ती: मेहंगा है..
तो: ... डिस्पोजेबल है, मॅडम
ती: मतलब - युज ऐंड थ्रो..
तो: हां...
......
.........
ती: वो दिखाना... कितने का है?
तो: ३० रु.
ती: बहोत मेहंगा है! ... डिमांड है, इसलिये इतना मेहंगा बेच रहे हो....
तो: नही मॅडम.... हमेंभी तो मेहंगा मिलता है!
....इथपर्यंत सगळं ठीक...

त्या नंतर त्या बाईने, मुंमुडासे खाली ओढुन तो मास्क लाऊन बघितला.... बसतोय असं वाटल्यानंतर, तिने तो परत ठेऊन नविन मास्क घेतला व पैसे देऊ लागली... समोरच्या एकाने तिला विचारले - मॅडम, अगर आपने वो पहले वाला मास्क लगाके देखा है तो वही खरीद लिजिये ना.... वो वैसेही वापस करके आप नया कैसे ले रहे हो...?

आपल्याला अगदीच काही न कळाल्याच्या आव आणत ती त्याला म्हणते, की मैने तो सिर्फ देखा के बैठता है की नही! आणि पैसे देऊन ती बाहेर पडली...!

दुकानदार, त्याला सांगेपर्यंत, तो मास्क इतर मास्क मध्ये मिसळुन परत ठेऊन देतो!!

एकतर स्वाईन फ्ल्यु संसर्गजन्य... त्यात असे लोक... मास्क वापरुन तो परत ठेवुन दुसरा उचलतात... आपण सुरक्षित झालो म्हणजे झालं... दुसर्‍याचं काय आपल्याला?
कसे लोक असतात ना...? आपण फार सुशिक्षित आहोत हे दाखवण्यासाठी केवढा मुर्खपणा करतात!
Reblog this post [with Zemanta]

Thursday 6 August 2009

स्वाईन फ्ल्यु - म्हणे आशियामधुन सुरु झाला!

विकि.वरती हे वाचनात आले की "एक्सपर्ट" च्या म्हणण्यानुसार:
Experts assume the virus "most likely" emerged from pigs in Asia, and was carried to North America by infected persons.
न्युयॉर्क टाइम्सनेही यालाच दुजोरा दिलाय!
.... मला हे माहितच नव्हते, तुम्हाला?

Reblog this post [with Zemanta]

Wednesday 5 August 2009

स्वाईन फ्ल्यु - माहिती व घ्यावयाची काळजी



स्वाईन फ्ल्यु चा भारतातला पहिलाच बळी पुण्याचा... कुणाची चुक, काय कारणं.... अनेक अनुत्तरीत प्रश्न! काळजी घ्या!

Sunday 2 August 2009

भटकंती: शिडीच्या वाटेने - भीमाशंकर!

पेबच्या भटकंती नंतर आता पुन्हा पावसाळी ट्रेकची स्वप्नं पडु लागली होती.... पण कुठं जायचं... तसे पर्याय भरभुर होते, पण विशाल म्हटला की त्याला भीमाशंकरला त्रिशुल आणि शिवलिंग यांची पुजा करुन स्थापना करायची आहे... मग काय.. भीमाशंकर लाच जायचं ठरलं... मेल - फोनची देवाण-घेवाण झाली आणि १ ऑगस्टला भीमाशंकरचा जंगल ट्रेक करायचा ठरला! इंटरनेवरुन बरीच माहिती काढली... कसं जायचं... कुठ रहायचं... आधी जाऊन आलेल्यांकडुन माहिती घेणं वगैरे - वगैरे! शिडी घाट की गणेश घाट असा वाद बराच रंगला.... कारण शिडी घाट म्हणजे "वन्स इन लाइफटाइम" म्हणता येइल असा थ्रिलिंग आहे, अंदाज एकंदरीत माहितीवरुन आला होताच! तेंव्हा तिथे जाऊनच ठरवु असे ठरवुन पुढच्या तयारीला लागलो.
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
पुर्ण वाचा...

आमच्या ऑफिसमधुन मी, अर्नब, सतिश, अमोल आणि दोन मित्र - सुरिंदर आणि रवि असे पुण्याहुन सातजण तयार झाले.... तर मुंबईहुन विशाल, उपेंद्र, स्टीव्ही, विशालची बहिण अर्चना आणि तिची मैत्रीण रचना असे पाच जण... एकंदरीत बारा लोक.. पुण्याच्या बर्‍याज जणांना शनिवारीच परत यायचे होते त्यामुळे आम्ही मुक्काम रद्द केला... असो.. तर नेहमीचीच ठरलेली जीप - सुमो घेऊन आम्ही सकाळी सातला पुण्याहुन निघालो... एक्सप्रेसवे - खोपोली - कर्जत करत, अंदाजे ९.३० ला "खांडस" या गावात पोहोचलो... मुंबईकरांना ट्रेन लेट झाल्यामुळं १२.३० वाजले.. तो पर्यंत आम्ही हलकासा नाष्टा करुन घेतला... आणि शिडी घाटाने जाण्यासाठी एक गाइडही ठरवला. गाइड ठरवताना शक्यतो तरुण ठरवा - कारण शिडी घाटामध्ये त्याची मदत लागतेच!

मुंबईकर आल्यानंतर वेळ न घालवता आम्ही खांडस गावातीतुन आमच्या मार्गी लागलो. ह्या डांबरी रस्त्याने अंदाजे २ की.मी. चालल्यानंतर एक आडवा रस्ता लागतो. उजव्या हाताला जाणारा रस्ता गणेश घाटातुन जातो तर ओढ्याच्या जवळुन जाणारी पायवाट शिडीघाटाकडे जाते. सोबत गाइड असल्यामुळे आम्ही जास्त डोकं चालवण्याच्या भानगडीत पडलोच नाही...! पुन्हा एकदा सर्वांची संमती घेऊन आम्ही शिडी रस्त्याने जायचे नक्की केलं आणि त्या मार्गे चालुही लागलो! समोरचा हिरवागार डोंगर जणु खुणावतच होता... दुरुन दिसणारे शिडी घाटातले दोन धबधबे त्यात भरच घालत होते... त्यांच्या खाली दिसणारा काळा कातळ दगड मात्र शिडी घाटाचा अंदाज देत मनात धडली भरवणारा!

गप्पा मारत मारत आतापर्यतचे अंतर अगदीच आरामात कापले होते...अंदाजे अर्ध्या तासाने एक छोटासा ओढा लागतो... सगळ्यांनी मस्त चेहर्‍यावर पाणी मारुन - पिऊन घेतले... सकाळपासुन आम्ही पावसाची अपेक्षा करत होतो.. मात्र पाऊस पडण्याचे नावच घेत नव्हता... हवेतील उकाडा आता जाणवायला लागला होता.. पाण्यात भिजऊन मी रुमाल डोक्याला बांधला... तेवढाच थंडावा! काही वेळानं आम्ही पहिल्या शिडीच्या जवळ पोहोचलो... अगदी सोपी वाटणार्‍या ह्या शिडीजवळ पोहोचल्या नंतरच तिचा अंदाज येतो.... खालुन दुसरी आणि वरुन पहिली पायरी तुटलेली ही "पहिली शिडी"! पहिली शिडी ही दोन दगडी पॅच जोडते.. तेही अगदी उभी [ मात्र ९० अंशात नक्कीच नाही]... मध्ये - खाली पाहिलं तर खाई! तेंव्हा अगदी सावधानतेनेच ही शिडी पार करा.

पहिली शिडी पार केल्यानंतर लागणारा दगडी पॅच अगदी तुमच्या हाताची शक्ती अन् तुमच्या मनाच्या तयारीचा अंत पाहणारा....! खाली पाय ठेवायला एखादी खाच.... त्या कातळ दगडाच्या खाचीत हात घालुन आपले पुर्ण वजनहातावर सांभाळत पुढे सरकावे लागते. याचवेळी आपल्या वाढलेल्या वजनाचा अन् पोटाच्या घेराचा खरा अंदाज येतो! स्वतःला उभारण्यापुरती जागा पाहुन मी एकेकाला पुढे जाण्यासाठी - त्यांच्या पाठी - दरीच्या बाजुना उभा राहुन आणि "यु कॅन डु इट!" असा मॉरल सपोर्ट देत - देत एकेकाला पुढं पाठवत होतो.... याच ठीकाणी "शांताराम" नावाच्या गाइडने केलेली मदत ही न विसरण्यासारखी! त्याच्या मदतीचे आभार माणण्यासाठी १०० रु. देऊ केले... मात्र ही त्याच्या मदतीची अन् चांगुलपणाची किंमत नक्कीच नाही....! तुम्ही जर प्लान करत असाल तर खांडस गावातुन "शांतारामला" जरुर बरोबर घ्या!

पहिली शिडी पार केल्यानंतर जवळच दुसरी शिडी आहे.. ही पहिली पेक्षा जरा लांब... मात्र कोणत्याच शिडीला खालुन वरुन सपोर्ट नसल्यामुळे बर चढताना बरीच हलत होती..... शिवाय थंडगार पाणीही अंगावर उडतच होते.. पाऊस असता तर कदाचित वरुन पडणार्‍या पाण्याचा मार जोरदार लागला असता.... आणि शिवाय हा रस्ताही अधिकच रिस्की झाला असता! सर्वांना पुढे धाडत ... खांद्यावरची ती चार पाच किलोची सॅक सांभाळत मी सर्वात शेवटी मी दुसरी शिडीही पार केली!

दुसर्‍या शिडीनंतर थोडीशी उभी चढण आहे... सावध - सांभाळत आंम्ही तिसर्‍या शिडीपर्यंत पोहोचलो... ही शिडी सर्वात नविन म्हणता येइल.. आधी हिच्या जागी लाकडी शिडी होती... पावसाळ्यात काय हालत होत असेल ना? माझ्या माहितीनुसार धुमकेतु ग्रुपने ही शिडी - लोखंडी - बसवली आहे... अशा या मोक्याच्या ठीकाणी शिडी लावुन रस्ता केल्याबद्दल त्यांचे अनेक आभार! शिडी इतर दोन शिड्यांपेक्षा जरा लांबच आहे.. शिवाय - खाली आणि वरती फक्त टेकवली असल्याने भकाम असा सपोर्ट नसल्याने पुन्हा हवेतच! या शिड्या चढताना आपले वजन शक्यतो पुढच्या बाजुला झुकलेले ठेवा.... म्हणजे शिडी नेहमी पुढच्या बाजुने दगडाला चिटकुन राहील...!

ही शिडी संपली की पुन्हा थोडी उभी दगडावरची चढण आणि एक वळण - उजव्या हाताला. हे वळण घेताना, शेजारच्या दगडाला गोल - पकडुनच सरकत रहा... शक्यतो खाली पाहु नका...! या ट्रेकचा बराचसा भाग एका-वेळी-एकच जाऊ शकेल असा आहे.... त्यामुळे घाई - गडबड करु नका...आणि हो.. स्वतःवर विश्वास ठेवा.... भीतीमुळे तुम्ही अर्धे अवसान गाळुन बसला तर तुमची ही अवस्था तुमच्या बरोबर इतरांनाही त्रासदायक ठरते!

हे वळण घालुन थोडं पुढे काही अजुन अंतर चालल्या - चढल्या नंतर मस्त धबधबा लागतो.. [पहिल्या फोटोतल्या दोन धबधब्यांपैकी हा डाव्या हाताचा!]..... बस्स! सगळी मंडळी या ठीकाणी थोडा आराम म्हणुन बसलो... पैकी काहीजण लगेचच धबधब्याखाली गेले.. मस्त पाण्याखाली भिजुन, खाण्यासाठी बसले.... गुड-डे, खजुर आणि मुंबईवाल्यांनी आणलेल्या ब्रेड - बटरवर मस्त ताव मारला.... मात्र पोट भरुन जेवणाचा - खाण्याचा मोह अशावेळी टाळावाच लागतो.. नाहीतर बाकीचं अंतर चालणे होणारच नाही....! गाइड काका चला - चला.... अजुन बरंच जायचं आहे असं म्हणुन सर्वांना पुन्हा मार्गी लावत होते... एकंदरीत आम्ही शिडीचा - अवघड भाग पार केला होता.. मात्र अजुन बराचसा भाग चढायचा बाकी होता... मग.. पुन्हा चढाइला सुरुवात!
बाकी ... खाल्ल्यानंतर ... आपण आणलेला आपला मौल्यवान कचरा पुन्हा आपल्याच बॅगेत भरुन परत न्या! शहाण्यासी पुन्हा - पुन्हा सांगणे न लगे!..!

हा चढ संपला की मस्त पठार लागते... थोडयाच अंतरावर एक झोपडीवजा चहाची सोय असणारे हॉटेल [?] दिसते... गाइडकाकांनी पुन्हा समोरचा डोंगर दाखवत तो चढायचा असल्याचे सांगितले....म्हणजे अजुनही जवळ - जवळ अर्ध्याहुनही जास्त अंतर पार करायचे बाकी होते!.. तेंव्हा मात्र सगळेच त्या झोपडीत घुसले... चहा पिल्यावरच पुढे - एकच कल्ला!.. मग काय.... तेरा चहा... [अमॄततुल्य चहाची अपेक्षा मनात सुद्धा आणु नका!]... पित - पित .. काहींची फोटा-फोटी - फोटोगिरी सुरु... मात्र पुन्हा गाइड सायबांच्या आज्ञेला मान देऊन पुढचे चालणे - पठारी - सुरु झाले.. समोरच्या डोंगरावर चढणारी मंडळी आता नजरेत भरु लागली होती... काही अंतरावरच गणेश घाट आणि ह शिडी घाट रस्ता एक होतो... आणि मग दोन्ही रस्त्याचे मुसाफिर एकाच मार्गाने वाटचाल सुरु करतात!
भीमाशंकरचा जंगल ट्रेक करण्यासाठी शारिरीक तयारीबरोबर तुमची मानसीक तयारीही फार महत्त्वाची.. कोणत्याही ट्रेक - भटकंती मध्ये मनात कधीही - मला शक्य नाही किंवा मला जमणार नाही असं आणु नका... बरेच कठीण प्रसंग अगदी तुमच्या इच्छा शक्तीच्या पुढे सहज सोपे होतात... मात्र तुमची माघार तुमच्या बरोबर असणार्‍या साथीदारांनाही कमजोर करते!
जिथे हे दोन रस्ते मिळतात त्या ठीकाणी मोबाइल नेटवर्कही मिळाले.. लागलीच सर्वांनी "घरी यायला उशीर होइल - सुखरुप आहोत" सांगुन टाकले!.... या ठीकाणी झोपडी सारखे हॉटेलही [२] आहेत.. तुम्ही जर परत उतरणार असाल तर जेवणाची ऑर्डर देऊ शकता.... मस्त चिकन वगैरेचा बेत होऊ शकतो.... पण श्रावणात नक्की सांगता येणार नाही.... आणि शिवाय - देवाला - देव कार्याला गेल्यानंतर वेज खाणंच योग्य, नाही का?

चालुन चालुन सारेच दमले होते... शिवाय.. त्या जंगलात चावणारे लहान-लहान कीडे आणि त्यानंतर होणारी खाज यामुळे सगळेच पिसाळुन गेले होते..काही लोकं जे शॉर्टवर आले होते, त्यांचे पाय, विशेषतः, अगदीच लाल-लाल झाले होते... जिकडे - तिकडे लाल टिपके..! आधी म्हटल्या प्रमाणे ही वाट अरुंद असल्यामुळे एका वेळी एकच जाऊ शकतो... त्यामुळे बर्‍याच ठीकाणी ट्राफिक जाम झाल्यासारखं वाटत होतं शिवाय लांबच्या लांब रांगही होतीच... मुंग्यासारखी ..... या ठीकाणी वाटेत अवघड म्हणण्यासारखे पॅचेस नाहीत मात्र बराच वेळ चढाई करत रहावे लागते!

जस जसं वरती चढत होतो.. तस तसं धुकं वाढत होतं.... मात्र .. वातावरण प्रसन्न होत चाललं होतं.... मला स्वत:ला तरी बरंच हलकं आणि फ्रेश वाटत होतं... रस्त्यात अनेक वृद्ध लोकही अगदी विश्वासानं चालताना तर काही अगदी अणवाणी [चप्पल वगैरे न घालता] चालताना दिसले... काही वेळानं धुक्यात अगदी पुर्णपणे हरवलेलं तलाव दिसलं.. काही लोक तिथं स्नान [डुबकी] करत होते... मी आणि इतर काहींनी - बम - भोले म्हणत- झटपट पाण्यात एक-एक डुबकी मारुन घेतली.... वर - वर ठीक वाटणारं पाणी अगदीच चिल्ड होतं, हे पाण्यात उतरल्यावरच जाणवलं! पटापट कपडे बदलले... तो पर्यंत बाकीचे लोक येउन थांबले होते..!..त्या प्रसन्न वातावरणात दुरवर टाळ - घंटानादाचा आवाज जाणवत होता!

एव्हाना ट्रेक सुरु करुन [१ ते६] पाच तास झाले होते... दाट धुक्यात मंदिर शोधणं जरा अवघडच वाटलं.. पण पाणी भरायला आलेल्या एकानं मंदिराचा रस्ता दाखविला.... त्या धुक्यांत अगदी जवळच घंटा - टाळ वाजण्याचा आवाज अस्पष्ट ऐकु येत होता.. आवाज्याचा दिशेने आम्ही पुढं चालत राहिलो आणि अगदी धुक्यात गुडुप झालेलं मंदिर दिसु लागलं! ................................
.......................................................
..................................................................

................................. खांडसला आम्हाला सोडुन गाडी पुन्हा भीमाशंकरला बोलावली होती... त्यामुळे पार्किंगमध्ये गाडी शोधुन त्यात बॅगा वगैरे टाकुन आम्ही दर्शनाला रांगेत उभारलो! रांगेत असतानाच आरतीही सापडली... नशिबवानच - आम्ही सारे! आरती नंतर पिंडीवर डोकं टेकवुन शिवाचं दर्शन झालं... मन आणि शरीर अगदी ताजं - तवाणं..! मंदिराचं बांधकाम अगदी भक्कम दगडी आहे.... अंदाजे १४०० वर्षापुर्वीचं असावं! समोरच शनिचं छोटसं मंदिर.. वरती चिमाजी अप्पांनी वसईहुन आणलेली घंटा बांधली आहे! त्याच्या बाजुलाच दिपमाळ ...! अजुनही काहीसं डाग-डुजींचं काम चालु आहे वाटतं... !

दर्शन होईपर्यंत ८.३० वाजले आणि आता आम्हाला परतीचा विचार करावा लागला.. मुंबईकरांच्या राहण्याची सोय करण्यातच पुन्हा दोन तास गेले... मंदिराच्या आवारातच असणार्‍या खोल्यांत राहण्यास "त्या मुली" तयार नसल्याने पुन्हा शोधा - शोधी सुरु!... एक हॉटेल मिळालं.. ५-७ कि.मी . अंतरावर.. आणि आमची गाडी त्यांना सोडण्यास गेली... मात्र दाट धुक्यात काहीच दिसत नसल्याने १० मिनिटात सारे परतले... आणि त्यांना मंदिराच्या आवारातच रहावे लागले! ... असो.. त्यांना सोडुन आम्ही ११ वाजता आमच्या मार्गी लागलो... पण समोरचं काहीच दिसत नव्हतं! फुल लाइट लाऊनही! ड्रायवरला काचेवर तंबाखु चोळायला सांगुन... कागदाने काच साफ केली... काचेवर थोडा तरी फरक पडला... मात्र समोरचं धुकं हटायला तयार नव्हतं... समोरुन एक इंडिका वाला काही अंतर जाऊन परत आला होता आणि आम्हालाच राहण्याचा पत्ता विचारत होता....!
शेवटी बॅटरी हातात घेऊन मी, सुरिंदर आणि अमोल असं तिघांना काही अंतर जीपच्या समोर रस्ता दाखवत चालायचं ठरवलं... आणि त्याप्रमाणं आमचा परतीचा प्रवास सुरु झाला!
समोरुन येणार्‍या वहानांना लाइट दाखवुन - हळु करत आम्ही चालत होतो....एक - दीड कि.मी. नंतर धुकं मावळलं आणि आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो....!

पोटातले कावळे आतापर्यंत मरायला टेकले होते... ढाबा - हॉटेल शोधत राजगुरुनगर आले आणि आम्ही एका ढाब्यावर इथेच्छ जेवण केलं!.... रात्रीचे १.३० वाजले होते...जवेणानंतर सारे, गाडीत मस्त झोपुन गेले...! सकाळी ३.३० ला माझा शेवटचा ड्रॉप झाला...!

घरी पोहचुन मस्त फ्रेश झालो...आणि लागलीच बिछान्यात घुसलो!

हुम्म... नेहमी प्रमाणे.. काही फोटो येथे आहेतच!


काही आठवणी:
  • खांडसमधेच उशिर झाल्यामुळे आम्हाला आंधार पडण्याआधी जंगल पार करणे आवश्यक होते.... मात्र शिडीघाटामुळे काही वेळ वाचवण्यास मदत झाली!
  • या अभयारण्यात आढळणारा शेकरु - खारीसारखा - प्राणी आम्हाला दिसलाच नाही!
  • धुक्यामुळं पुन्हा गाडीच्या पुढं रस्ता दाखवत चालावं लागत होतं... जणु- डु वन ट्रेक अँड गेट वन फ्री!
  • जर तुमचा राहण्याचा प्लान असेल तर त्याचं प्रयोजन आधी च करा... ६-७ कि.मी. वर ब्लु मर्मोन नावाचे हॉटेलआहे..


थोडक्यात भीमाशंकर!

Saturday 1 August 2009

मैत्रीच्या दिवसाच्या शुभेच्छा!

मैत्रीसाठी आणि मित्रांसाठी कोणता खास दिवस लागत नाही... तरीही एक कारण - आजच्या दिवसाचे ! हे नातं जपायचं! माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या सार्‍या मित्रांना शुभेच्छा!!


अरे हो.. नुकताच मित्र झालेल्या अनिकेतला [ हा ही भुंगाच बरका! ] आज मैत्रीबरोबर वाढदिवसाच्याही शुभेच्छा!
..... आणि गेल्यावर्षीचा हा मैत्रीचा लेख आहेच, तुमच्या वाचनासाठी आणि अधिक शुभेच्छासाठी...!