Categories

Aeroplanes

Aeroplanes

Saturday 18 September 2010

स्टार माझा - ब्लॉग माझा स्पर्धा

नमस्कार मंडळी! ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेच्या आयोजनाचं हे तिसरं वर्ष. पहिली ‘ब्लॉग माझा’ स्पर्धा घेतल्यानंतरच्या काळात मराठी ब्लॉगॉस्फिअरमध्ये खूप गोष्टी घडल्यायत. मराठी ब्लॉगर्सच्या पुण्या-मुंबईत गाठी-भेटी झाल्या, पुण्यातल्या साहित्य संमेलनापूर्वी आयोजित ‘संमेलनपूर्व संमेलन’ या कार्यक्रमात मराठी ब्लॉग, ब्लॉगर्सबाबत गंभीर चर्चा झाली, मराठी ब्लॉगर्स मंडळी इंटरनेटवर एकत्र आली, वृत्तपत्रांनी, नियतकालिकांनी मराठी ब्लॉगॉस्फिअरची ठळक दखल घेतली. एकूणच मराठी ब्लॉगॉस्फिअर देशातल्या प्रादेशिक ब्लॉगॉस्फिअरमध्ये दखल घेण्यायोग्य ठरलंय. हीच मराठी ब्लॉगरशिप सेलिब्रेट करतोय ‘स्टार माझा’; ‘ब्लॉग माझा’ सिझन-३च्या रूपानं.

विशेष म्हणजे यावेळी आपले परिक्षकही खास आहेत. ज्यात आहेत लीना मेहेंदळे ज्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तर आहेतच, पण संवेदनशील लेखिका आणि मराठी ब्लॉगरही आहेत. मराठीतल्या ‘साधना’ या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ आपले संपादकीय कौशल्य पणाला लावून तुमचे ब्लॉग तपासतील. तसंच, आयटी तज्ज्ञ माधव शिरवळकर हेही परिक्षक मंडळात आहेत.

तेव्हा, मंडळी तुमच्यात दडलेल्या लेखक / लेखिकेला केवळ डायरी, फेसबुक, ऑर्कुट किंवा ट्विटर पुरताच ठेवू नका. या स्पर्धेत भाग घ्या. ब्लॉगवर ताजं लिहिलं असेल तर ठिकच नाही तर ब्लॉग अपडेट करा. ब्लॉग नसेल तर या स्पर्धेच्या निमित्तानं सुरू करा.

काय म्हणालात? बक्षिसाचं काय? अहो, बक्षीसे आहेतच की! पहिल्या तीन जणांना आणि उर्वरीत दहा जणांना उत्तेजनार्थ. आता काय बक्षीसं आहेत ते गुपित राहू द्या की! शिवाय, तुमच्या निवडलेल्या ब्लॉगला ‘स्टार माझा’च्या वेबसाईटवर प्रसिद्धी आणि बक्षीस वितरण समारंभ थेट ‘स्टार माझा’वर!

मराठी माझी, ब्लॉग माझा, स्टार माझा.................शुभेच्छा!

स्पर्धेचे स्वरूप-

१. ब्लॉग मराठीतच लिहिलेला हवा (देवनागरी)
२. अठरा वर्षांपुढील कुणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतं.
३. सर्वोत्तम ब्लॉग निवडण्याचे अधिकार पूर्णत: परिक्षक आणि स्पर्धा संयोजकांकडे असतील. त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यास परिक्षक, संयोजक, स्टार माझा बांधिल नसतील. तुमच्या एन्ट्रीज
या तुम्हाला अटी मान्य असल्याच्या निदर्शक असतील.
४. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी blogmajha3@gmail.com या ई-मेल अँड्रेसवर ई-मेल करावा. ज्यात, तुमचे नाव, पत्ता, व्यवसाय, दूरध्वनी क्र, मोबाईल क्र, व ई-मेल द्यावा. ई-मेल अँड्रेस देणं अनिवार्य आहे. याशिवाय, तुमच्या ब्लॉगची लिंक द्यावी.
५. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही.
६. एकावेळी एका स्पर्धकाला फक्त एकच ब्लॉग पाठवता येईल.
७. ब्लॉग पाठवण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१०. स्पर्धेचे निकाल ऑक्टोबर २०१०च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतील. तसेच, संबंधित विजेत्यांना पत्र अथवा ई-मेलद्वारे निकाल कळवला जाईल.
८. यानंतर ‘स्टार माझा’च्या खास एपिसोडमध्ये विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल व पुरस्कार वितरण होईल.
९. स्पर्धेचे आयोजन, नियमावली, अटी, बक्षीसे यासंदर्भात कोणत्याही पूर्वसुचनेशिवाय बदल करण्याचे अधिकार स्टार माझाकडे असतील.
११.ब्लॉगमधला कंटेंट स्वत:चाच असावा. जर अन्य स्त्रोतांकडून माहिती घेतली असेल, तर त्यांचा नाममिर्देश करावा. ब्लॉग या माध्यमाचे महत्व जपावे. ब्लॉग व त्यातील मजकूर आपलाच असल्याचे सिद्ध करणे, ही स्पर्धकाची जबाबदारी आहे.

ता. क.: एन्ट्रीज blogmajha3[@]gmail.com वरच पाठवा.

स्पर्धेच्या माहितीसाठी श्री. प्रसन्न जोशी यांची ई-मेल - जशीच्या तशी.

Sunday 12 September 2010

अपत्यः मुलगा की मुलगी - एक वादंग!

चालु पिढीमध्ये "एकच मुल" ही कल्पना ( नक्की कल्पना की योजना? ) बर्‍यापैकी जम धरतेय. विषय तसा वैयक्तिक आणि सेन्सिटीव्ह आहे. मी ही त्याच त्याच विचाराचा. त्यात बायकोही त्याच मताची मिळाली. मग काय - आम्ही दोघं - आमचं एकच! मात्र आजकाल बर्‍याचदा मित्रमंडळी - पाहुणे - यांच्याकडुन "अरे, वेदिका पाच वर्षाची झाली ना? मग अजुन काय विशेष?" अशी विचारणी चालु असते. आता ते "विशेष" म्हणजे "दुसरा चान्स कधी घेताय?" याचा शॉर्ट कट!

अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]
अपत्यः मुलगा की मुलगी [फोटो - अनिकेत समुद्र]

तर - दुसर्‍या अपत्याबद्दल बोलुत. मी जेंव्हा "एकच" या विषयांवर ठाम राहिलो तेंव्हा खालील प्रश्नांची देवाण - घेवाण झाली. आता हे प्रश्न कुणी आणि का विचारले हे न विचारलेलं आणि सांगितलेलं बरं!

ते - वंशाला दिवा हवा!
मी - म्हणजे दुसरं अपत्य मुलगाच हवा - असंच ना?
"तुम्हाला मुलगाच होईल - हे खा - ते प्या - असं करा - तसं करा" या थोतांडावर माझा विश्वास नाही. जर आम्हाला मुलगा व्हायचा होता - तर तो पहिल्यांदाच झाला असता! आता वंशाच्या दिव्याच्या नावाखाली चक्क "मुलगाच पाहिजे" असं सांगताहात. शिवाय मुलगा की मुलगी हे चेक करण्याचीही आपली तयारीच असेल. [ - हो, काही ठिकाणी आजही अशा चाचण्या होतात - शोधल्यावर देवही सापडतो - डॉक्टर का नाही? ] आणि मग जर या चाचणींत "मुलगी आहे" असं कळालं तर अ‍ॅबॉर्शन करा असंही म्हणायचा तुम्ही मागं - पुढं पाहणार नाही!

ते - नाही.. असं नाही - दुसरीही मुलगीच झाली तर हरकत नाही!
मी - असं कसं नाही. उद्या तुम्ही तिला - मुलाच्या जागी जन्मली - असा टोमणा कशावरुन नाही मारणार? शिवाय दोन मुलं सांभाळण्याची आमची तयारी आणि परिस्थितीही नाही! दोघांना चांगल्या परीनं वाढवणं - चांगलं शिक्षण हे मला शक्य नाही.

ते - ज्यांन चोच दिलीय तोच दानापण देईल! गरीबाची मुलंही खेड्यात राहुनही डॉक्टर - इंजिनिअर होतातच ना? तु झालासच ना?
मी - झालं - पुन्हा देवावर भार टाकुन मोकळं! माझी व बायकोचीही यासाठी मनाचीच तयारी नाही. जिथं कुटुंब फक्त माझ्या एकट्याच्या कमाईवर चालतं तिथं - दुसरं अपत्य करुन दोघांनाही उगाच मारुनमटकुन जगवायचं नाही. त्यापेक्षा एकालाच आम्ही चांगलं वाढवु - शिकवु! गरीबाची मुलं - गावी खेड्यात राहुन - तालुक्याच्या ठीकाणी शिकुन डॉक्टर - इंजिनीअर होतात, पण त्या खेड्याचं नाव "पुणे" किंवा "मुंबई" असं नसतं ना!
मी शिकलो ना - पण त्यासाठी - नातेवाईकाकडे शिकायला रहावं लागलं. लहाणपणीच आई-वडिलांपासुन दुर राहणं मी अनुभवलंय. माझ्या अपत्यांनं तेच पुन्हा अनुभवावं असं मला मुळीच वाटत नाही. शिवाय हेच वाक्य त्यांन मला पुन्हा ऐकवावं हे तर मुळीच वाटणार नाही.

ते - राखी-पौर्णिमा/ भाऊबीज यासारख्या प्रसंगी मुलीनं भाऊ म्हणुन कुणाकडं पहावं?
मी - [ हा जरा सेंटी प्रश्न! ] आता एकच मुलगी असणारा मी काय जगातला एकमेव बाप आहे का? काहींनी तर मुलगा - वंशाचा दिवा पेटवता पेटवता - मुलींची अगदी रांगच लावलेली असते ना!
ठीक आहे - मी एक मुलगा दत्तक घेतो. त्यालाच राखी बांधेल.

आता मात्र "दत्तक" विधानासाठी "त्यांची" अजिबात तयारी नसते. त्यामुळं हा प्रश्न इथंच कट् करण्या येतो.

ते - म्हातारपणी मुलगाच सांभाळेल ना? मुलगी लग्न करुन निघुन जाईल!
मी - हो - मुलगी लग्न करुन जाईलच. मात्र मुलगा सांभाळेच कशावरुन? मुलानंच वार्‍यावर सोड्लेले आणि मुलीनं आधार दिलेले आई-वडिलही मी पाहिलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे - म्हातारपणी आमची कुणी सेवा करणारं [करणारा!] असावं यासाठी मुलगा जन्माला घालणं हे नात्यांपेक्षा - एक बिझनेस डील वाटतं- नाही का? म्हातारपणाची मी तयारी करीनच. मुलीला वाटलं तर ती देईल लक्ष - नाही तर नाही! मात्र तीनं ते करायलाच पाहिजे अशी आमची तरी अपेक्षा नाही.

.... विषय बंद!

अपत्यं कधी आणि किती असावीत हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र होणार्‍या अपत्याच्या आयुष्याचाही विचार करा ना! करीयर - सेटलमेंट च्या नावाखाली पस्तीसी पर्यंत टोलवा-टोलव करताना आपण खाली दिलेले मुद्दे लक्षात घेताहात का:
अ. आपलं अपत्य जेंव्हा ग्रॅज्युएट होईल तेंव्हा त्याच्या पदवी वितरणात तुम्ही त्यांचे आजोबा - आजी तर वाटणार नाही ना? कारण आता तुम्ही ३०-३५ असाल तर २० वर्षांनी तुम्ही ५०-५५ चे असाल!
ब. आपलं अपत्य शिकुन कमवते व्हायला अंदाजे २५-३० वर्षे धरली तर तुम्ही त्याच्या लग्नात हजर असाल का?

अपत्यं किती असावीत हाही तसाच गहण प्रश्न. माझ्या परिस्थितीच्या [ आर्थिक - सामाजिक सर्व बाबतीत ] मानानं मला एकच अपत्य हवं होतं - आहे. पाहिजे तर माझी लायकी तेवढीच आहे असं समजा. आजचा काळ - आणि १५-२० वर्षांनी येणारा आपल्या मुलांचा काळ यांचा विचार करुनच प्रत्येकानं निर्णय घ्यावा. " उगाच एक ना धड - भाराबर चिंध्या " करुण्यात काय अर्थ आहे. उद्याच्या परिथितीला - अपत्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची ठेवुनच निर्णय घ्या!

प्रश्न बरेच असतात - आहेत - त्यांना उत्तरेही असावीत. मात्र काही प्रश्न अनुत्तरीतच चांगले वाटतात!